Thursday 9 November 2017

माणगंगा नदीचे भाग्य उजाडले, संघटित लोकशक्तीतून घडली जल क्रांती

[11/9, 5:07 PM] Vijay Lale:
माणगंगा नदीचे भाग्य उजाडले, संघटित लोकशक्तीतून घडली जल क्रांती,
गाव करील ते राव काय करील अशी एक उक्ती आहे, संघटित लोकशक्तीतून काय साध्य होते ते संबंध जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला दिसत आहे. स्थानिक पत्रकार आणि ग्रामस्थानी ३५० ते ५०० मिली मीटर सरासरी पाऊसमान असलेल्या भागातल्या माणगंगा नदीच्या तब्बल नऊ किलो मीटर पात्राचे  पुनरुज्जीवी करण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला निसर्गाने साथ दिली. यंदा गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच माणगंगा नदीची ओटी गच्च पाण्याने भरली आहे. हि नदी दुथडी भरून वाहत आहे. एवढेच नव्हे तर हौशी मंडळींनी या नदीत होडी आणि यांत्रिक बोटी आणून जल सफारीही सुरु केली आहे.
सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर सामावलेल्या माणदेशाची जीवन वाहिनी माणगंगा नदी. गेल्या कित्येक वर्षात आपले नैसर्गिक वाहणेच हरवून बसली होती. दहिवडी (ता. माण,जि.सातारा) येथूनच्या उगमा पासूनच दुष्काळाचा कलंक नशिबी असलेल्या या नदीच्या १८० किलो मीटरच्या अंतराला बाहेरून पाणी आणून वाहती करण्याचे अनेक जणांनी अनेक पर्याय आणि उपाय सुचवले आहेत. यात भीमा खोऱ्यातून पाणी आणणे, सह्याद्रीच्या डोंगर रांगांत पडणारे पावसाचे पाणी वळवणे, नीरा नदीच्या कालव्याचे पाणी नदी पात्रात सोडणे असे एक ना अनेक. परंतु प्रत्यक्ष नदीच्या परिसरात पडणारे पाणी अडवण्याची सहज गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नव्हती. सांगली जिल्ह्यातील कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या दिघंची (ता. आटपाडी) येथील काही उत्साही पत्रकार या साठी पुढे आले. त्यांनी गावकर्यांना साद घातली. राजकारण्यांना राजकीय मुखवटे दूर करून पाण्याच्या कामात एकत्र येण्याचे आवाहन केले. हि गोष्ट फार मागची नाही , मागच्या आठ एक महिन्यातलीच. ग्रामस्थ, राजकारणी , व्यापारी , शेतकरी सगळ्यांनी माणदेशाच्या गंगेला, माई माणगंगेला पुन्हा वाहती करायचीच असा जणू निर्धारच केला आणि त्यातून कामे सुरु झाली.दिघंची गावाजवळून जाणारया माणगंगा नदीचे तब्बल ९ किलो मीटर लांबीचे पात्र खोल आणि रुंद करायचे ठरवले. नदी पात्रात अमाप झाडे वाढली होती, अनेकांनी अतिक्रमणे केली होती, आड, विहिरी काढल्या होत्या, प्रत्येक ठिकाणी जे नदीच्या नशिबात येते तेच इथे हि मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाला होता. वरची वाळू पार खरवडून काढली होती. खालच्या स्तरातल्या असणाऱ्या वाळूचे पार सिमेंटीकरण झाले होते. बघता बघता कामे सुरु झाली. लोकांनी अगदी आपल्या घराचे कार्य असल्याप्रमाणे नेटाने ,निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पात्र मोकळे करण्याची कामे केली. झाडे, झुडुपे काढली.ती इंधन म्हणून काही गावकऱ्यांनी नेली. अतिक्रमणे हटवली, चार ते पाच फूट कठीण झालेली वाळू पोकलँड , जेसीबी सारख्या अजस्त्र यंत्रांच्या साहाय्याने उचलली आणि तिथेच टाकली. या सर्व कामी लोक वर्गणी काढली. ती कमी पडली म्हणून  नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फौंडेशन चे सहकार्य घेतले.जूनच्या अखेर पर्यंत सगळी कामे आटोपली. आता प्रतीक्षा होती ती पावसाची... या भागात मूळ मान्सून चा पाऊस पडत नाही. परतीच्या पावसावरच सगळी भिस्त.यंदा मात्र वरूण राजानेहि गाववाल्यांना नाराज केले नाही. होता नव्हता तेवढा मागच्या १० - २० वर्षांचा सगळा दुष्काळाचा बॅकलॉग भरून निघत भरपूर पाऊस पडला. नदीला मिळणारा गावाचा ओढासुद्धा फुल्ल भरला. या ओढ्याचे काम सुद्धा  याच काळात केले होते. सगळी कडे पाणीच पाणी. लोकांनाच आनंद गगनात मावेना. त्यांनी जिल्हाधिकाऱ्या पासून सगळ्या राजकीय मंडळींच्या पर्यंत जाऊन , फोन वरून एकदा नदी भेटीची आमंत्रणे दिली. काही उत्साहीनी होडी आणि यांत्रिक बोटी आणून गावकऱ्याना  आणि बघायला येणाऱ्या मंडळींना त्यातून जलसफारी घडवली.
[11/9, 5:28 PM] Vijay Lale: विटा : विजय लाळे

https://goo.gl/TN7sg